व्यापारी ,हमाल ,मापाडी , गुमास्ता तसेच कर्मचारी संघटना आंदोलनात होणार सहभागी, कामकाजवर होणार परिणाम
अमळनेर (प्रतिनिधी )महाराष्ट्र शासनाच्या विधेयक ६४ च्या विरोधात अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी ,हमाल ,मापाडी , गुमास्ता तसेच कर्मचारी संघटनेने २६ रोजी काम बंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे बाजार समितीच्या कामकाजवर परिणाम होणार आहे. शासनाने २०२४ विधेयक ६४ नुसार अधिनियमात सुधारणा करून बाहेर बाजार तळ उभारून शेत माल खरेदीची परवानगी देण्यात येणार आहे. आणि बाजार समितीला फक्त समिती आवारातच खरेदी करण्याचे बंधन येणार आहे. यामुळे बाहेरची कोणीही व्यक्ती माल खरेदी करणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला तसेच पैशाला सुरक्षा नसेल , बाजार समितीचे नियंत्रण नसेल , भाव बाबत हमी नसेल , कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल , बाजार समित्यांवर शासनाचे नियम असल्याने हमाल ,मापाडी , गुमास्ता याना मिळणारा मोबदला नियमाप्रमाणे व कुटुंबाची उपजीविका होईल या पद्धतीने दिला जात आहे. बाजार समितीत शेतकरी तातडीने संचालक मंडळ अथवा सचिवांकडे तक्रार करू शकत होता.परंतु नव्या नियंमाप्रमाणे खाजगी बाजार तळांवर नियंत्रण नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास त्यांना तातडीने दाद मागता येणार नाही.
कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली बैठक
या निर्णयविरोधात कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी, संचालक मंडळ, कर्मचारी, गुमास्ता , हमाल, मापाडी यांची बैठक झाली. बैठकीत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश बोथरा, व्यापारी संचालक वृषभ पारख , प्रकाश वाणी , हमाल संघटनेचे अध्यक्ष रमेश धनगर , संचालक शरद पाटील , मापाडी संघटनेचे अध्यक्ष महादू पाटील , कार्यध्यक्ष प्रभाकर पाटील , गुमास्ता संघटनेचे युवराज पाटील , कर्मचारी संघटनेतर्फे सचिव डॉ उन्मेष राठोड , अशोक वाघ, सुनील सोनवणे ,योगेश महाजन यांनी २६ रोजी बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. व शेतकऱ्यांनी आपला माल विक्री करण्यास आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
२९ रोजी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण
तसेच या निर्णयाविरोधात २९ रोजी तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. आणि यानंतरही विधेयक रद्द न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.